श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा २१ वा चातुर्मास शके १८३३ (इ. स. १९११) कुरुगड्डी (कुरवपूर) येथे संपन्न झाला. कोल्हापूरचे श्री. शेषो कारदगेकर दर्शनासाठी सहकुटुंब आले होते. त्यांना संतती होत नव्हती व कर्जही बरेच झाले होते. त्यांची श्रीास्वामी महाराजांवर एकांतिक श्रद्धा होती. “आपली दुःखे आपल्या देवाजवळ सांगावयाची नाही तर दुसर्या कोणाजवळ सांगावयाची?”, असा विचार करून त्यांनी या दोन्ही गोष्टी श्री स्वामीमहाराजांच्या कानावर घातल्या. स्वामीमहाराजांनी श्री. शेषो कारदगेकर यांच्या मंडळींच्या ओटीत प्रसादाचा नारळ घातला व संतती होईल व कर्ज फिटेल असा आशिर्वाद दिला. त्याप्रमाणे पुढे त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली व कर्जही फिटले. शेषो कारदगेकर यांच्या प्रार्थनेप्रमाणे महाराजांनी त्यांना वेंकटरमणचे पद करून दिले होते.
या प्रकारे आपल्या सर्व अडचणी दूर करून घेतल्यावर आपल्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट दूर व्हावेत, सर्व लोक सुखी रहावेत आणी सर्वांना अखंड मंगलाची प्राप्ती व्हावी म्हणून एक दिवस श्री. शेषो कारदगेकर यांनी श्री स्वामीमहाराजांना अशी प्रार्थना केली की, “माझ्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावेत म्हणून श्रीपादश्रीवल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी करून द्यावे.” शेषो कारदगेकर यांच्या इच्छेप्रमाणे श्रीस्वामीमहाराजांनी “घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकारकस्तोत्र” रचून त्यांना दिले. श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडीस हे स्तोत्र रोज म्हंटले जाते. या स्तोत्राचा अनुभव अनेक लोकांना आला आहे व येत आहे. काहीजण तर याचा १०८ वेळा पाठ रोज करणारे आहेत व त्यांचे ऐहलौकिक व पारलौकिक कल्याण झाले आहे. खरोखर श्री शेषो कारदगेकरांचे आपणा सर्वांवर उपकार आहेत की त्यांच्यामुळे हे दिव्य स्तोत्र प्राप्त झाले आहे.
संकटनिवारण होण्यासाठी तसेच गुरूग्रहपिडा दूर होण्यासाठी प्रभावी !! घोरकष्टोधरणस्तोत्रम !!
